July 13, 2010

सारपास- एक अविस्मरणीय अनुभव

पूर्वार्ध:

साधारण जानेवारी महिन्याचा काळ होता. माझा कॉलेज मधील मित्र प्रसाद जोशी याने हिमालयीन ट्रेकिंग चा त्याचा मानस आमच्या कॉलेजच्या कॅनटीन मध्ये बोलून दाखवला. सुरुवातीला मी त्याला काही प्रतिसाद दिला नाही. संध्याकाळी सहज बाबांच्या कानावर हा मानस घातला तर अनपेक्षितपणे मला लगेच संमती मिळाली. मग प्रसादने प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण करायची जवाबदारी घेतली, आणि जाताना-येताना दोन्ही वेळचे गरीबरथ एक्सप्रेसचे आरक्षण केले(त्याचा फायदा झाला खूप नंतर. सुखकर प्रवासाचे श्रेय मी प्रसादला देईन ) मग मी आणि बाबा साधारण फेब्रुवारी मध्ये परळ च्या युथ होस्टेलच्या ऑफिसात नाव नोंदवून आलो. त्यांनी १७ मे ची बॅच मला आणि प्रसाद ला दिली. प्रसाद बरोबर त्याचा भाऊ श्रीकांत हासुद्धा येणार होता.
मी ट्रेकची तयारी TYBcom च्या परीक्षेनंतरच करायचे ठरवले होते. २७ एप्रिलला माझी परीक्षा संपली आणि मी तयारी चालू केली. पहिल्यांदाच एवढे दिवस घराबाहेर जाणार असल्याने खूप सामान दिलेलं आई वडिलांनी. हिमालयातील थंडी लक्षात घेऊन थंडीचे कपडे आणायचं चाललेलं पण अचानक पुण्याच्या काकाकडून ते आणायचं ठरल आणि ते आई घेऊन आली. बाकी इतर बारीक सारीक वस्तू मी प्रसाद श्रीकांतनि सल्लामसलत करून घ्यायचे ठरवले. त्यात असे कळले कि आमच्याबरोबर श्रीकांतचा मित्र प्रदीप, प्रदीपचा मित्र मंदार आणि मंदारचा मित्र गौरवपण येणार आहेत. साधारण १५ तारखेला मे सगळ्या बॅग भरून ठेवल्या आणि जाण्यास सज्ज झालो.

15 मे २०१०
अखेर तो दिवस उजाडला. सकाळी सर्व आप्तांना कळवून मी जेऊन आईबरोबर दुपारी १ च्या सुमारास निघालो. गरीबरथ वांद्रे टर्मिनस स्थानकातून निघते. वांद्रेपर्यंत चे तिकीट काढून २ च्या लोकलने दादर गाठले. दादरला प्रसाद, श्रीकांत आणि प्रदीप भेटले. मग आम्ही ब्रीज चढून पश्चिम रेल्वेच्या लोकलने वांद्रे गाठले. वांद्रे स्थानकात मंदार बोरिवलीहून आला. गौरवने दिल्लीकडे पश्चिम एक्सप्रेसने आधीच प्रयाण केले होते,त्यामुळे तो दिल्लीत भेटणार होता. वांद्रे स्थानक ते वांद्रे टर्मिनस हे १५ मिनिटाचे अंतर भर उन्हात आम्ही कापले. तो भाग झोपडपट्टीचा आणि अत्यंत घाणेरडा आहे. आईने कोरडा खाऊ न त्या दिवशीच रात्रीच जेवण अस भरगच्च अन्न बरोबर दिल्याने मला सामानाचा तिसरा जोड करावा लागला. आम्ही ३.३० च्या सुमारास एकदाचे वांद्रे टर्मिनस गाठले. गाडी ५.३० ची असल्याने निवांत होतो. मग एकमेकांच्या ओळखी झाल्या कारण प्रसाद आणि श्रीकांत सोडून, प्रदीप आणि मंदार मला नवीनच होते. काही वेळाने माझे आणि प्रसादचे बाबा ऑफिस मधून परस्पर वांद्रे टर्मिनसला आले. मग मी आणि प्रसाद गाडीच्या डब्यांची स्थिती पाहायला गेलो. वांद्रे टर्मिनस चे दुसरे टोक जवळपास खारच्या वेशीपर्यंत जाते. तिकडे स्टेशन मास्तरकडे चौकशी केली, तिकडे काही स्थिती कळली नाही, मग आम्ही तसेच परत आलो. साधारण ५ वाजता इलेक्ट्रोनिक इंडिकेटर वर नेमका आम्ही बसलो तिकडे आमचा G-१ डब्बा येणार होता. गाडी वेळेवर आली मग आम्ही चढलो, बॅग ठेवल्या. या चौघांचे बर्थ २१-२४ असे ओळीत होते मला ७५ क्रमांकाचा बर्थ होता. पण ते आम्ही परस्पर adjust करून घेतले. ५.३० ला गाडी वांद्र्याहून रवाना झाली आणि आम्ही सर्वांचा निरोप घेतला.

आमच्या समोरच्या बर्थ वर एक गुजराती कुटुंब आल्यापासून डबा डोक्यावर घेत होते, त्यांचे वैशिट्य म्हणजे त्यांनी गाई सुटल्यापासून ते चरायला सुरुवात केली ते दिल्ली पर्यंत त्याचं चरण चालूच होत. मी मंदार,प्रसाद गप्पा मारत होतो. श्रीकांत पुस्तक वाचत बसलेला. प्रदीप बर्थवर आडवा झाला(त्याला झोपायची किती आवड आहे ते नंतर समजलच). साधारण ८.३० सुरत आलं. मग आम्ही जेवायला बसलो. मंदारचा शनिवारचा उपवास होता त्यामुळे त्याने उपवासाचा चिवडा आणलेला(नंतर चुकून बाकरवडी तोंडात टाकली आणि गिळल्यावर कळल पठठयाला उपवास आहे ते). मे मटकीची उसळ, प्रसादने परोठे, श्रीकांतने चित्रान्न(कानडी भात) आणलेला. संपवताना नाकी नऊ आले सगळ्यांच्या(शेवटी मीच संपवल सगळ). मग तासाभराने बडोदा स्थानकात मी आणि प्रदीप उतरलो तिकडे शीतपेय घेतली. १० च्या सुमारास झोपायचे ठरले, बॅगाना व्यवस्थित कुलूप लावली. मग श्रीकांत-प्रदीप सर्वात वरच्या बर्थवर, मंदार-प्रसाद मध्ये आणि मी सर्वात खालच्या बर्थवर झोपलो(झोप लागली नाही सामान चोरीला जाण्याच्या भीतीने,जग राहव म्हणून पुस्तक वाचत बसलो होतो उशिरापर्यत). मध्येच रात्री समोरच गुजराती कार्ट उठल आणि खायला मागायला लागला आईकडे त्याच्या. आश्चर्य म्हणजे आईने त्याला खाकरा दिल्या(मनात विचार आला, आमच्या आईने उत्तरपूजाच केली असती आपली) वाचता वाचता झोप कधी लागली कळलच नाही.


१6 मे
सकाळी ८.३० च्या सुमारास उठलो. तर माझ्याआधी सर्व उठलेले. उठल्यावर कळले गाडी जवळपास २ तास उशिराने धावत आहे. त्यामुळे १०.३० च्या ऐवजी आम्ही १२.३० पर्यंत दिल्ली गाठू असे वाटले. मग आवरून सकाळी नाश्त्याला परोठे खाल्ले, मग प्रसाद मी आणि मंदार रमी खेळत बसलो(मी शिकवली त्यांना). श्रीकांत वाचनात गुंग तर प्रदीप आराम करत होता. रखडत रखडत गाडी साधारण १ च्या सुमारास हजरत निजामुद्दिन स्टेशनला पोहोचली. मग गौरवपण तिकडे आधीच पोहोचलेला असल्याने तो तिकडेच भेटला. मला खर तर दिल्लीच्या पुढील प्रवासाची काहीच idea नव्हती. ते सगळ मे प्रसादवर सोपवलेल. आम्हाला मग काश्मिरी गेट भागातील ISBT ला जायचे होते. मग आम्ही निजामुद्दीन ते नवी दिल्ली स्टेशन एका दुसऱ्या गाडीने गेलो. मी नवी दिल्ली स्टेशन पहिल्यांदाच पाहत होतो. अत्यंत गजबजलेल,विस्तीर्ण, सगळे टिपिकल उत्तर भारतीय बांधव दाटीवाटीने जागा मिळेल तिकडे ठाण मांडून बसले होते(महाराष्ट्रात पण तेच करतात). नवी दिल्लीचा भला मोठा पुल ओलांडून स्टेशनबाहेर आलो.

आल्याआल्या सामना करावा लागला ते दिल्लीच्या प्रचंड उन्हाळ्याचा, त्यादिवशी तापमान ४५ होत. उन्हाच्या प्रचंड झळ्या लागत होत्या. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला लागूनच नवी दिल्ली मेट्रोरेल्वे स्टेशन आहे. तिकडे तिकीट काढायला गेलो तर ही प्रचंड लाईन(ठाणे स्थानकापेक्षा पण जास्त म्हणजे बघा). प्रदीप,प्रसाद,मंदार तिकीट काढायला गेले. मी,श्रीकांत,गौरव (भल्यामोठ्या सामानाची) रखवालदारी करत होतो(दिल्लीत चोऱ्यामाऱ्या फार होतात अस ऐकून होतो म्हणून). अर्ध्यातासाने तिकीट घेऊन तिघं परत आले. मग आम्ही ट्रेन पकडायला प्लॅटफॉम वर निघालो तर बघितल विमानतळावर होते तशी आमची आणि आमच्या सामानाची तपासणी केली गेली. दिल्ली तशी मला फार आवडली नसली तर मेट्रोच मात्र मी खूप कौतुक करेन, गर्दीचे, सुरक्षेचे, ट्रेनच्या frequency अत्यंत सुंदर,काटेकोर नियोजन केले आहे शीला दीक्षित बाईनी. नवी दिल्ली नंतर चांदणी चौक मग लगेच काश्मिरी गेट आलं. ते मेट्रो स्टेशन म्हणजे मॉलच होता तो. नंतर आम्ही हिमाचल प्रदेश मधील ‘भून्तर’ च्या संध्याकाळच्या बसच तिकीट काढायचं ठरवल. प्रवास तसा कंटाळवाणा झाल्याने आम्हाला लक्झरी बस हवी होती, पण गर्दीचा मौसम असल्याने आम्हा सहा जणांना एका बसच तिकीट मिळाल नाही. तिथे जरा प्रदीपचे न माझे-प्रसाद चे मतभेद झाले. प्रदीप वेगवेगळ्या बसने जायला तयार होता. पण मी आणि प्रसाद ने काही झालं तरी एकत्र जायचं ह्या बाण्यावर ठाम राहिलो शेवटी तेच सर्वानी मान्य केल. मग आम्ही भून्तर साठी हिमाचल परिवहन च्या जनरल बस च(आपलं महामंडळ) तिकीट काढलं.

तेव्हा साधारण दुपारचे ४ वाजले होते. जेवण झाले नसल्याने पोटात आग पडली होती सर्वांच्या, आणि त्यात उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे चांगल्या हॉटेल साठी पायपीट न करता आम्ही तिकडेच एका साध्या हॉटेलात जेवलो(ते त्याने कधी बनवल होत देव जाणे). पावती मागितली तर वरचा कर भरावा लागतो हे पहिल्यांदाच पाहत होतो. बस ७.३० ची होती. जेवण होईपर्यंत आम्हाला ५ वाजले. वेळ कसा काढायचा हा मुख्य प्रश्न होता. उन्हाने आणि प्रवासाने हैराण असल्याने कुठे फिरायची आमची ताकद नव्हती दिल्लीत. मग काश्मिरी गेट च्या मॉलमध्ये McDonald मध्ये आम्ही गेलो. तिकडे आईस्क्रीम मी रवंथ करत २ तास खात बसलो होतो, काय करणार वेळ काढायचा होता(तिकडे अजून ठाण मांडायचं कारण मंदार-श्रीकांतला माहितीच आहे). ७.१५ ला आम्ही ISBT च्या बस स्थानकात गेलो. तिकडे बघतो तर प्रचंड मोठा आवार. अतिशय गलीच्छ, घाणेरडा, प्रचंड गोंगाट आणि प्रचंड गर्दीने गजबजलेला होता. ७ क्रमांकाच्या फलाटाला आमची भून्तर ची बस वेळेत आली. आमच्या प्रचंड सामानाला बसमध्ये ठेवायला जागा नव्हती मग कंडक्टर लं विचारून मी प्रदीप, श्रीकांत बसच्या टपावर सामान ठेवायला गेलो. सामानाला कुलुपं लावून ते दांड्याला व्यवस्थित बांधल. साधारण ८ च्या सुमारास बस रवाना झाली भून्तरला. दिल्लीच अजून एक वैशिट्य म्हणजे रुंद, चौपदरी आणि सुंदर रस्ते. बस लागायच्या भीतीने डॉक्टर श्रीकांत कडून बस न लागायच्या गोळ्या घेतल्या. दिवसभराच्या पळापळीने दमलो असल्याने मी लगेच झोपलो. अपेक्षेप्रमाणे बसच्या सीट जुनाट आणि २ सीटमधील अंतर फारच लहान होते त्यामुळे पाय अडकले होते(हा त्रास नंतर प्रत्येक बस मध्ये झाला). बाकी सगळे बस मध्ये जिथे ब्रेक घ्यायची तीकडे उतरायचे पण मी मात्र काही उतरलो नाही(थोडक्यात विकेट पडलेली)

No comments: